दोस्ती नाय तर मस्ती नाय


आमचा MBBS मित्र-मैत्रिणींचा व्हाट्सअप ग्रुप म्हणजे “मैत्र जीवाचे“. आमची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबादची ऍडमिशन १९८४ ची. त्यामुळे आम्ही सगळे “MJ ८४” (मैत्र जीवाचे ८४)! गजाननने २०१३ मध्ये “मैत्र जीवाचे” ग्रुप बनवला आणि एकेक करत १०० पैकी ८१ फ्रेंड्सचा ग्रुप बनला. आमच्या क्लासचे बऱ्याचदा गेट-टुगेदर झाले पण मला जॉईन होण्याचा आत्तापर्यंत योग आला नव्हता. वेळ जुळून येत नव्हती. माझ्या फ्रेंड्सनी सांगितले कि तू जेव्हा इंडियाला येशील तेव्हा आपण गेट-टुगेदर करू. माझे जवळपास ७ वर्षांनी इंडियाला जायचे ठरले. आम्हाला सलग २ आठवड्याची सुट्टी मिळू शकते. त्यापेक्षा जास्त हवी असेल तर आमच्या चेयरमनची परमिशन घ्यावी लागते (जास्तीत जास्त ३ आठवड्यांची परवानगी देतात). मला परवानगी मिळाली आणि मी लगेच विमानाची तिकिटे बुक केली. तीन आठवड्यात खूप लोकांना भेटायचे होते आणि खूप ठिकाणी फिरायचे होते. त्यासाठी वेळ कमीच पडणार होता. त्यामुळे देगलूरला जवळ पडतील अशी दोन ठिकाणे निवडली. नांदेड आणि लातूर. जेव्हा ग्रुपमध्ये मी शेयर केले कि मी इंडियाला येत आहे आणि तुम्हा सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे. लगेच लातूरच्या फ्रेंड्सनी ग्रीन सिग्नल दिला. मी एका वीकेंडला इंडियात पोहोचणार होते आणि त्याच्या नंतरचा विकेंड म्हणजे सप्टेंबर २० आणि २१ असे आमच्या गेट-टुगेदरचे डेट्स ठरले. मला नांदेडला सेप्टेंबर २० ला शालेय मैत्रिणीचा गेट-टुगेदर करून संध्याकाळी लातूरच्या गेट-टुगेदरला जॉईन व्हायचे होते. पूर्ण दोन दिवस जॉईन होता येणार नाही म्हणून थोडे वाईट वाटत होते. पण काय करणार! सगळ्यांची भेट तर होणार होती ह्याचा आनंद होता.

अजयने छान प्लॅनर बनवला होता ज्यामध्ये दोन दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा तसेच ड्रेस कोडची माहिती दिलेली होती. टीम लातूर म्हणजे विश्वास, संगीता, सुनील, सुनंदा, अजय, सुरेंद्र यांनी आपल्या बिझी लाईफ मधून वेळ काढून गेट-टुगेदरसाठी खूप प्लॅनिंग केले होते. नांदेडच्या गेट-टुगेदर नंतर माझ्या लातूरच्या चार शालेय मैत्रिणींसोबत मी लातूरला निघाले. त्यांनी मला लातूरच्या कार्निवल रिजॉर्टमध्ये ड्रॉप केले. लातूरला जाईपर्यंत सुनंदा आणि सुजाताचे फोनवर फोन येत होते. कुठे आहेस? किती वेळ लागेल? आम्ही वाट पाहतोय वगैरे वगैरे. शेवटी तो सुंदर क्षण आला. मी रिजॉर्टला पोहोचले. अतिशय सुंदर असे ते रिजॉर्ट होते. त्याच्या प्रवेशदारात “MJ ८४ Batch” चे बॅनर्स लावलेले होते. त्यावर लिहिले होते कि Good friends are like stars. You don’t always see them, but you know they’re always there. एकंदरीत राजेशाही थाट वाटत होता.

आम्ही सात मुली होतो आणि आमचा पैठणी नेसून रील्स बनवायचा प्लॅन होता. मैत्रिणी बिचाऱ्या माझी वाट पाहून कंटाळून गेल्या होत्या. मी तिथे गेल्या गेल्या रील करायचे ठरले. मला पैठणी नेसायला तसेच गाण्याचे स्टेप्स शिकायला वेळ नव्हता. मनाला येईल त्या स्टेप्स करण्याची मला मुभा दिली गेली होती. सहा मैत्रिणी पैठणीत आणि मी ड्रेस मध्ये असे आम्ही २ रिल्स बनले.

थोड्याश्या विश्रांती नंतर रात्रीच्या गाला नाईटसाठी सगळ्यांना एका हॉल मध्ये जमायचे होते. मुलींसाठी वनपीस आणि मुलांसाठी सूट असा ड्रेस कोड होता. हॉल खूप छान डेकोरेट केलेला होता. एकीकडे फूड सेक्शन होते. जेवणात चक्क कलाकंद होते जे कि माझे खूप फेवरेट आहे आणि माझ्या माहेरचे हमखास माझ्यासाठी आणत असतात. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी माहेरपणाची जाणीव झाली. एकदम प्रसन्न वाटत होते.

एक एक करत विश्वास, सुनील, अजय, सुनंदा, संगीता, सुरेंद्र, अब्दुल, बिमल, पांडुरंग, दिलीप, दोन्ही श्रीकांत, गजानन, गिरीश, जगन्नाथ, प्रभाकर, जवाहर, माधव, शशिकांत, मेघना, सुजाता, सुषमा, नितीन, प्रवीण, राजेंद्र, रमेश, रवी, संजय, सरला, दुर्गादास, गयास, सचिन आणि राजेश्वर असे सगळे मित्र-मैत्रिणी जमले. जवाहर लंडनहून आलेला होता. श्रीकांत सिंगापूरहून आणि मी अमेरिकेहून. असे तीन NRI हे ह्या गेट-टुगेदरचे विशेष आकर्षण होते. बाकीचे मित्र-मैत्रिणी मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद, नागपूर, परभणी, नांदेड, परळी, लाडसावंगी हून आले होते. मी सगळ्यांना जवळपास ३४-३५ वर्षांनी भेटले होते. प्रत्येकाला असेच वाटलं होते कि मी कदाचित त्यांना ओळखणार नाही. एक अपवाद वगळता मी सगळ्यांना संपूर्ण नावासहित अचूक ओळखले. त्यानानंतर सगळ्यांना अपेटायझर आणि ड्रिंक्स सर्व्ह केले जात होते.

इव्हेंट मॅनेजर, मिस्टर समीर बजाज, एक अतिशय लाघवी व्यक्तिमत्व होते. कमी वेळात तो आम्हा सगळ्यांचा मित्र बनला होता. मग डान्स फ्लोअर वरती एक एक जण उतरत होते. आम्हा सगळ्यांचा धांगडधिंगा सुरू झाला.

त्यानंतर स्टेज वरती एक सुंदर केक आणला गेला आणि आम्ही सगळे स्टेजवर गेलो. माझ्या हस्ते केक कटिंग झाली. सुजाताने पुण्याहून माझ्यासाठी स्वतःच्या हाताने एम्ब्रॉयडरी करून एक सुंदर जीन्स वरचा टॉप शिवून आणला होता. तो तिने मला स्टेजवर दिला. तसेच तिने लातूरकरांसाठी फ्लोरल शर्ट्स आणले होते. त्यानंतर दुर्गादासचे गाणे झाले. राजेंद्रची गाणी झालीत. सुजाताचे हार्मोनिकावर गाणे झाले. त्यानंतर सुजाता आणि श्रीकांतचे ड्युएट गीत पण झाले. कार्यक्रमाला रंगत चढत होती.

त्यानंतर ऑस्करच्या तोलामोलाचा अवॉर्ड सेरेमनी झाला. सगळ्या फ्रेंड्ससाठी खूप कल्पकतेने अवॉर्ड्स बनवून घेतलेले होते. एका योग्य शब्दात त्या व्यक्तीचे वर्णन त्या अवॉर्डने केलेले होते. उदाहरणार्थ: most creative, most polite, most handsome, most cheerful, most confident, most enthusiastic. खूप सुंदर कल्पना होती. प्रत्येकाला स्टेजवर बोलावून “टीम लातूर” ने एकेक करत अवॉर्ड दिले. माझ्यासाठी त्यांनी Most Determined असे निवडले होते. गप्पा, जोक्स, डान्स, फोटो, विडिओ अशी धमाल सुरु होती. मध्यरात्र कशी उलटून गेली ते कळलंच नाही.

गाला नाईट नंतर आम्ही सगळे थकून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी झुंबा सेशन होता. आमच्यापैकी काहीजण झुंबासाठी ना म्हणत होते पण समीरने कोणाचेच ऐकले नाही. त्यांनी सगळ्यांना पार्टिसिपेट करायला लावले. सगळ्यांना जमतील असे सोपे स्टेप्स वापरून अर्धा-एक तास विविध गाण्यावरती आम्हाला नाचायला लावले. खूप मजा आली. झुम्बा नंतर फ्रेश होऊन फ्लोरल ड्रेस कोड असलेल्या पूल पार्टीसाठी आम्ही सगळे जमलो. मी सुनंदाने खास माझ्यासाठी घेतलेला फ्लोरल कोओर्ड आऊटफिट घातला.

चहा-कॉफी-ब्रेकफास्ट आणि गप्पा होत असताना मी सगळ्यांसाठी मागवलेले गिफ्ट प्रत्येकाला दिले. फायबरचे ऐप्रनच्या शेपमधले पेन स्टँड आणि त्याच्या मागे “मैत्र जिवाचे 2025 लातूर” असे लिहिले होते. गिफ्ट्स ऑर्डर करून मागवण्यासाठी अजयची खूप मदत झाली होती.

त्यानंतर पूल पार्टी सुरु झाली. समीरने आम्हाला खूप नवीन प्रकारचे गेम्स खेळायला लावले. आम्ही मुली पाण्यात जाऊन फोटोज रील्स वगैरे करत होतो. पूल पार्टी नंतर एका मोठ्या डार्क हॉलमध्ये आम्हाला सगळ्यांना नेण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की स्वतःचा शोध घ्यायचा आहे! आम्हाला लक्षात आले नाही की नेमके त्याला काय म्हणायचे आहे. लिथोफेन नाईट ग्लोब होते. त्यावर “MJ 84” तसेच प्रत्येक ग्लोबवर आमचे सगळ्यांचे फोटो होते आणि आम्हाला आपापला ग्लोब शोधायचा होता. थोडक्यात स्वतःचा शोध घ्यायचा होता. समीरने १-२ रील्सही बनवून घेतले.

त्यानंतर कार्निवल मधून चेकआउट करायचे होते आणि विश्वासच्या फार्म हाऊसला जायचे होते. तिथे आमचे लंच अरेंज केलेले होते. आम्ही सगळे खुलगापूरच्या फार्म हाऊसला पोहोचलो. निसर्गरम्य परिसरात असलेले अतिशय सुंदर फार्म हाऊस सुंदर रीतीने सजवलेले होते. भली मोठी सुस्वागतमची रांगोळी होती.

आमचे खूप छान तिथे स्वागत झाले. सुरुवातीला गरम गरम मक्याचे कणीस खाल्ले. गप्पांना तर ऊत आला होता. लातूर स्टाईलचं जेवण होतं. मऊ भात, तूप, मेतकूट, लोणी, मठ्ठा, जीरा राईस, वांग्याचे भरीत, भाकरी, थालीपीठ, ठेचा, शेंगदाण्याची चटणी असे एकाहून एक सरस पदार्थ होते. आम्ही सगळ्यांनी गप्पा मारत स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर विश्वास आणि अनुजाने त्यांच्यातर्फे सगळ्यांना गिफ्ट दिले. व्हरांड्यात आम्ही सगळे खुर्च्या टाकून गप्पा मारत होतो. विश्वास आणि इतर फ्रेंड्सनी मला माझी स्टोरी शेअर करण्यास सांगितले. एमबीबीएस झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा माझा प्रवास सगळ्यांना ऐकायचा होता. मग मी जवळपास 20 ते 25 मिनिटात माझा सगळा प्रवास सांगितला.

सगळे मित्र-मैत्रिणी आपापल्या आयुष्यात अतिशय यशस्वी झालेले होते पण कोणालाही ग ची बाधा झालेली नव्हती. सगळे अगदी डाऊन टू अर्थ वाटले. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा मला वाटणारा आदर आणि प्रेम द्विगुणीत झाला. पुन्हा लवकरच भेटू या असे म्हणत सगळ्यांचा निरोप घेऊन मी तिथून निघाले. पाच ते सहा आठवड्यांचा काळ लोटला पण अजूनही गेट-टुगेदरच्या आठवणी तशाच ताज्या आहेत. माझ्या १९८४ च्या मेडिकल कॉलेज बॅचने केलेले माझे असे हे आगळे वेगळे माहेरपण म्हणायला हरकत नाही.

आयुष्यात प्रत्येकाने एकदा नव्हे अनेकदा शाळा कॉलेजातल्या मित्र मैत्रणींना भेटून नवी उमेद, जिद्द आणि आनंदाचे क्षण गोळा करत रहावेत. कोणास ठाऊक भविष्यात काय लिहिले आहे ते! पटतंय ना?

दिन बीत जाते है सुहानी यादें बनकर,
बाते रह जाती है कहानी बनकर,
पर दोस्त तो हमेशा दिल के करीब रहते है,
मुस्कान बनकर।


One Reply to “  दोस्ती नाय तर मस्ती नाय”

  1. खुपच छान वर्णन केलय सावि. परत आठवणी ताज्या झाल्या.
    Love you..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *